पत्रकार मकरंद भागवत यांना स्व.नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार जाहीर..

पत्रकार मकरंद भागवत यांना स्व.नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार जाहीर..

 

 

*पत्रकार मकरंद भागवत यांना राज्यस्तरीय

‘स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ जाहीर*

 

चिपळूण – ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा राज्यस्तरीय ‘स्व. नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार’ चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी ग्रॅण्ट रोड, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संघटनेच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांना राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दैनिक सागरचे संस्थापक संपादक आणि कोकणचे बुद्धिवैभव म्हणून ओळखले जाणाऱ्या स्व. निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष असून यासाठी चिपळूण येथील ज्येष्ठ पत्रकार आणि आपल्या सडेतोड लेखणीने समाजात वेगळे स्थान निर्माण केलेल्या मकरंद भागवत यांना देण्यात येणार आहे. मकरंद भागवत यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात दैनिक सागर मधून केली. गेल्या तीस वर्षांत काही दैनिकांमध्ये उपसंपादक म्हणून काम केले. स्वमालकीच्या साप्ताहिक आणि मासिकाचे त्यांनी चांगल्या रितीने संपादन केले आहे. सध्या ते डिजिटल माध्यमातून पत्रकारितेत सक्रीय असून समाज माध्यमावर राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर परखड लिखाण करत असतात.

या पुरस्काराबद्दल ऑल जर्नालिस्टचे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल, प्रदेशाध्यक्ष ऍड. विठ्ठल मोघे, केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रमुख विश्वस्त गणेश कोळी आदींनी मकरंद भागवत यांचे अभिनंदन केले असून रत्नागिरी जिल्ह्यातूनही भागवत यांचे कौतुक होत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा वीस ऑगस्टला मुंबई येथे मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत होणार असून भागवत यांच्यासह राज्यातील अन्य काही पत्रकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.

 

*मनस्वी आनंद…*

दरम्यान, या पुरस्काराविषयी बोलताना मकरंद भागवत यांनी ‘तीस वर्षांपूर्वी ज्यांच्या हाताखाली पत्रकारितेचा श्रीगणेशा केला त्या नानांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो अशी भावना व्यक्त केली आहे.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *