ठाकरे शिवसेनेकडून गुणवंतांचा सन्मान!

ठाकरे शिवसेनेकडून गुणवंतांचा सन्मान!

*गुणवंतांचा गौरव, उज्ज्वल भवितव्याला सलाम! कोकणच्या शैक्षणिक परंपरेचा शिवसेनेने पुन्हा केला सन्मान*

 

देवरुख : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा शनिवारी देवरुख येथील मराठा भवनमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील दहावीतील प्रथम तीन तसेच बारावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखांमधील तालुकास्तरीय प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

आजच्या गढूळ राजकारणातही शिक्षण, विद्यार्थी आणि युवापिढीच्या प्रश्नांप्रती संवेदनशील भूमिका घेणारा पक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना सातत्याने कार्यरत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ गौरवाचा कार्यक्रम नसून कोकणातील ज्ञानपरंपरा, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेचा उत्सव असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.

 

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी कोकणच्या शैक्षणिक परंपरेचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्रातील विविध भागांतील शैक्षणिक संस्था पाहिल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी धडपडणारे पालक, समर्पित शिक्षक आणि त्यांच्या प्रयत्नांना न्याय देणारे विद्यार्थी जर कुठे असतील तर ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातच असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

देशभरात शिक्षण व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांचा संदर्भ देताना राऊत यांनी नीट परीक्षेतील गैरव्यवहारांचा उल्लेख केला. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या घोटाळ्यांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता देश अनुभवत असताना कोकण मात्र भ्रष्टाचारमुक्त, कॉपीमुक्त आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा व्यवस्थेमुळे वेगळी ओळख निर्माण करून आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोकणातील विद्यार्थ्यांचे यश हे केवळ गुणांचे नव्हे तर सुसंस्कृत शिक्षण व्यवस्थेचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सातत्यपूर्ण शंभर टक्के निकालांचे कौतुक करताना त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांचे यश मुंबईतील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जुलै-ऑगस्ट महिन्यात मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्याचा मानस असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना राऊत यांनी भविष्यात सुशिक्षित आणि सामाजिक भान असलेल्या तरुणांनी राजकारणातही पुढे यावे, असे आवाहन केले. भ्रष्टाचारमुक्त, लोकहितवादी आणि पारदर्शक राजकारण उभे करण्यासाठी गुणवंत युवकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील शिवसेनेच्या कामांचा उल्लेख करताना राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आल्याची आठवण करून दिली. या संस्थेमुळे आज जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस डॉक्टर मिळत असून कोकणच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

नूतन शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश कदम यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्त यांच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठण्याचे आवाहन केले. युवांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक विधायक उपक्रमामागे आपण ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांसोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष नेहमीच उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला. कोकणातील शैक्षणिक विकासाला विनायक राऊत यांसारख्या नेतृत्वाने सातत्याने प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले. माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिवसेनेच्या कोकणातील शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद हा या उपक्रमाच्या यशाचा खरा पुरावा ठरला.

 

या गुणगौरव सोहळ्यास शिवसेना नेते विनायक राऊत आणि माजी राज्यमंत्री रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन नूतन संपर्कप्रमुख सुरेश कदम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन रविंद्र डोळस यांनी

तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, बळीराम गुजर, मयुरेश पाटील, कमलाकर कदम, युवराज हंदे, तालुका संपर्कप्रमुख शांताराम चव्हाण, मुकुंद पड्याळ, मंगेश साळवी, जगदीश झुलूम, अनिल भुवड तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण रत्नागिरी, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना आणि अंगीकृत संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडले. संघटनात्मक एकजूट, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

 

युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत युवक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राबाबत असलेल्या त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनाचे कौतुक केले. कोकणातील गुणवंतांना प्रोत्साहन देत नवी पिढी घडविण्याचा शिवसेना आणि युवासेनेचा संकल्प या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

 

या सोहळ्यास जिल्हा संघटक संतोष थेराडे, लोकसभा संपर्क संघटिका नेहा माने, महिला जिल्हा संघटिका वेदा फडके, शिवसहकार सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शिंदे, युवासेना सहसचिव प्रद्युम्न माने, जिल्हा युवासेना अधिकारी प्रसाद सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद कदम, महादेव (बाळा) कदम, अशोक सखरे, तात्या सरवणकर, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, सहसंपर्कप्रमुख रमेश आगरे, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, मोहन तोडकरी, प्रशांत साळुंखे, संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य विशाखा कुळेकर, संगमेश्वर पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे, क्षमा संतोष जाधव, दन्नराम लाखण, अपर्णा जाधव, देवरुख नगरसेवक बाळा कामेरकर, नेडा कपडी, रितिका कदम, रत्नागिरी नगरसेवक अमन विलणकर, केतन शेट्ये, फौजिया मुजावर, विनय गुरव, सुबोध पवार, उपजिल्हा महिला संघटिका रशिदा गोदड, उल्का विश्वासराव, विधानसभा क्षेत्र संघटिका अनिशा नागवेकर, राजापूर तालुका संपर्क संघटिका, संगमेश्वर तालुका संपर्क संघटिका सुवर्णा खेडेकर, रत्नागिरी तालुका संघटिका ममता जोशी, संगमेश्वर तालुका संघटिका मेघा कदम, राजापूर तालुका संघटिका प्राची शिर्के, रत्नागिरी शहरप्रमुख सेजल बोराटे, युवासेना उपजिल्हा अधिकारी संतोष हातणकर, राजापूर तालुका अधिकारी सुभाष नवाळे, रत्नागिरी शहर युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा मांजरेकर, रत्नागिरी तालुका अधिकारी संदेश नारगुडे, रत्नागिरी शहर अधिकारी आशिष चव्हाण, चिपळूण शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, लांजा तालुका अधिकारी अभिजीत राजेशिर्के, देवरुख शहर अधिकारी अमर गवाणकर यांच्यासह शिवसेना रत्नागिरी (दक्षिण), युवासेना, युवतीसेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना, रिक्षासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत जाधव आणि नीलेश कुंभार यांनी केले.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *